Friday, 20 October 2017

दिनदर्शिका


शनिवार२१ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९कार्तिकA शुक्लपक्ष द्वितीया

सुर्योदय : ६:२६ म. पू.सुर्यास्त : ५:४४ म. नं.
-: आजचा सुविचार :-तारुण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचना काळ होय.
-: आजचे पंचांग :-मास : कार्तिकA • पक्ष : शुक्लपक्ष • तिथि : द्वितीयायोग : प्रीति • कारण : बालव • नक्षत्र : स्वाति
राहुकाल ९:१६ म. पू. - १०:४० म. पू.
 
यमगण्ड १:३० म. नं. - २:५५ म. नं.
कुलिक ६:२६ म. पू. - ७:५१ म. पू.
 
अभिजित ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.
दुर्मुहूर्त ६:२६ म. पू. - ७:११ म. पू., ७:११ म. पू. - ७:५७ म. पू.

Thursday, 19 October 2017

बलीप्रतिपदा

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा):-
                                              कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.
            साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला 'शुभा' असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस.
                 पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.
           घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच 'दिवाळसण' म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात.

पाडव्याचा मुहूर्त : स. 06.37 ते 08.55 / संध्या. 03.49 ते 06.08 वाजता.

दिनदर्शिका


शुक्रवार२०ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९कार्तिक शुक्लपक्ष प्रतिपदा

सुर्योदय : ६:२६ म. पू.सुर्यास्त : ५:४५ म. नं.
-: आजचा सुविचार :-मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
-: आजचे पंचांग :-मास : कार्तिक • पक्ष : शुक्लपक्ष • तिथि : प्रतिपदायोग : विश्कम्भ • कारण : किम्स्तुग्न • नक्षत्र : चित्रा
राहुकाल १०:४० म. पू. - १२:०५ म. नं.
 
यमगण्ड २:५५ म. नं. - ४:२० म. नं.
कुलिक ७:५० म. पू. - ९:१५ म. पू.
 
अभिजित ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.
दुर्मुहूर्त ८:४१ म. पू. - ९:२७ म. पू., १२:२८ म. नं. - १:१३ म. नं.

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन - आख्यायिका व महत्व:

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते.  अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.


प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.

लक्ष्मी पुजेसाठीचा मुहूर्त : संध्या. 06.08 ते 08.38 वाजता.

दिनदर्शिका


गुरुवार१९ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९आश्विन कृष्णपक्ष अमावास्या

सुर्योदय : ६:२५ म. पू.सुर्यास्त : ५:४६ म. नं.
-: आजचा सुविचार :-परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.
-: आजचे पंचांग :-मास : आश्विन • पक्ष : कृष्णपक्ष • तिथि : अमावास्यायोग : वैध्रुथि • कारण : चतुश्पाद • नक्षत्र : हस्त
राहुकाल १:३१ म. नं. - २:५६ म. नं.
 
यमगण्ड ६:२५ म. पू. - ७:५० म. पू.
कुलिक ९:१५ म. पू. - १०:४० म. पू.
 
अभिजित ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.
दुर्मुहूर्त १०:१२ म. पू. - १०:५७ म. पू., २:४४ म. नं. - ३:३० म. नं.

Wednesday, 18 October 2017

नरक चतुर्दशी

पराक्रमाचे स्मरण 'नरक चतुर्दशी'



दिवाळी पू्र्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक संदर्भांच्या आधारे ग्रामीण संस्कृतीत नरक चतुर्दशीला आजही विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते.

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही, असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.


नरकासुराने अश्या एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अशाच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती.

या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या 16,100 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते.

सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची (पणती लावण्याची ) प्रथा आहे असे मानले जाते. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेवून त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.

दिनदर्शिका

बुधवार१८ऑक्टोबर २०१७
 
तिथि : शके १९३९आश्विन कृष्णपक्ष चतुर्दशी

सुर्योदय : ६:२४ म. पू.सुर्यास्त : ५:४७ म. नं.
-: आजचा सुविचार :-संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव!!
-: आजचे पंचांग :-मास : आश्विन • पक्ष : कृष्णपक्ष • तिथि : चतुर्दशीयोग : इन्द्र • कारण : विस्टि/भद्र • नक्षत्र : उत्तरफाल्गुनी
राहुकाल १२:०६ म. नं. - १:३१ म. नं.
 
यमगण्ड ७:५० म. पू. - ९:१५ म. पू.
कुलिक १०:४० म. पू. - १२:०६ म. नं.
 
अभिजित NIL
दुर्मुहूर्त ११:४३ म. पू. - १२:२८ म. नं.

Tuesday, 17 October 2017

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी म्हणजे काय?


आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते.

सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या -चांदीने दिपतात. या कारणास्तव यम यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी अख्यायिका प्रचलित आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.


धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. त्या दिवसास 'धन्वंतरी जयंती' असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. या दिवशी लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. वैद्य लोक या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवसापासून घरांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे.

लक्ष्मीची / धनाची पूजा मुहूर्त : संध्या. 6:10 ते 8:39 वाजता.

दिनदर्शिका

मंगळवार १७ ऑक्टोबर २०१७



तिथि : शके १९३९ आश्विन कृष्णपक्ष त्रयोदशी


सुर्योदय : ६:२४ म. पू.सुर्यास्त : ५:४८ म. नं.

-: आजचा सुविचार :-मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

-: आजचे पंचांग :-मास : आश्विन • पक्ष : कृष्णपक्ष • तिथि : त्रयोदशीयोग : भ्रह्म • कारण : गरिज • नक्षत्र : उत्तर

Saturday, 23 September 2017

शक्तीपीठे

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे

                                          नवरात्रोत्सवाला अतिशय उत्साहात प्रारंभ झालाय आणि नवरात्र म्हणजे शक्ती उपासनेचे पर्व. प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे. कारण शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते.
चला तर आज त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

पहिले शक्तीपीठ- अंबादेवी माता (कोल्हापूर) : -
                                        महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोल्हापूर हे आहे. येथे श्री महालक्ष्मी-देवी चा सदैव वास असतो. हे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.
अंबाबाईची मूर्ती 1.22 मीटर उंच असून ती एका 0.91 मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. कार्तिक आणि माघ महिन्यात अंबाबाईच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती अंबाबाईच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम अंबाबाईच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.
                                              एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. अंबाबाईने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे अंबाबाईने मान्य केले.

दुसरे पीठ - श्री रेणुकामाता (माहूरगड) : -

                                                           देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूरगडासमोर हे ठिकाण आहे. रेणुकादेवीचे फक्त शिर दिसते, धड नाही. रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व महापराक्रमी परशुरामाची आई. देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
       रेणुकेचे मंदिर लहानसे असून प्रवेशाचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजावर नगारखाना आहे. देवीला खलबत्त्यात पान कुटून नैवेद्य दाखवितात. नवरात्रीत येथे नऊ दिवस मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरा केला जातो. यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रीच्या काळात आणि एरव्हीही दागिन्यांनी नटलेली असते. तेथे रेल्वेने जाणे सर्वाधिक सोईचे आहे. रेणुका देवीला अनेक ठिकाणी विशेषतः कर्नाटकात यल्लमा नावानेही ओळखले जाते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर‘ आणि पुढे ‘माहूर‘ झाले. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

तिसरे पीठ - श्री तुळजाभवानी माता (श्रीक्षेत्र तुळजापूर):-
                                                                                                   महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनीही म्हटले जाते. तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवी. हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे 17 व्या किंवा 18 व्या शतकातील मंदिर आहे.
                                                              तुळजाभवानी मंदिरात अमृतकुंड आहे. अमृतकुंडात स्नान करूनच भाविक दर्शनासाठी जातात. तुळजाभवानी मंदिराचे अस्तित्व बाराव्या शतकापासून असल्याचे बोलले जाते. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये केलेले आहे. दरवर्षी भाद्रपद वद्य अष्टमीला देवीची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलविली जाते. त्यानंतर नवरात्रीच्या प्रारंभी ती सिंहासनावर येते.
                                                         तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्‍वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.

वणीचे अर्ध शक्तीपीठ - ‘सप्तशृंगीदेवी’ (सप्तश्रृंगगड,वणी): -
                              महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. मूर्ती दहा फूट उंचीची आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. प्रत्येक हातात एक शस्त्र आहे. मूर्तीला शेंदूर फासण्याची प्रथा येथे आहे. ही स्वयंभू आहे. महिषासुरमर्दिनी असेही तिला म्हटले जाते.
                                                               डोंगरातून वाट काढून देवीच्या दर्शनासाठी पायर्‍या तयार करण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी 500 पायर्‍या चढून वर जावे लागते. आता थेट शिखरापर्यंत मोटारीही जाऊ लागल्या आहेत. प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींचा आश्रम याच ठिकाणी होता. त्यांनी आदिशक्तीचे तप करून तिला प्रसन्न करून घेतले व तिला या डोंगरावर वास्तव्य करण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील एका डोंगराचे नामकरण मार्कंडेय देवीची मूर्ती 8 फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे.
       कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नावसप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

साडेतीन शक्तिपीठांची दंतकथा                                                                                पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे 51 तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच 51 शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली.

Wednesday, 30 August 2017

चालू घडामोडी


1. नवी दिल्ली - एनएसएसओच्या ताज्या सर्व्हेक्षणातून भारतात ग्रामीण भागातील 80 टक्के गरीब लोकांच्या घरांच्या राहण्यायोग्य जमिनीचे क्षेत्रफळ 449 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी.

2. कोलंबो - कसोटी आणि वनडे मालिकेत भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला .

3. नवी दिल्ली - जुलै महिन्यात 92 हजार 283 कोटींचा जीएसटी महसूल जमा झाल्याची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती.

4. लखनऊ - येत्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात 70 लाख तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.

5. गोरखपूर - उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेल्या 48 तासांमध्ये सात बालकांचा मृत्यू.

6. हरियाणा - हत्याकांडातील आरोपी असलेला सतलोक आश्रमाचा प्रमुख स्वयंघोषित संत बाबा रामपालची हिस्सार न्यायालयाने मुक्तता केली मात्र तरीही तुरुंगातच रवानगी

7. मुंबई - महाराष्ट्रात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, पंतप्रधानांकडून मदतीची हमी.

8.  मुंबई - मुंबई पाण्याखाली, तिन्ही रेल्वेमार्ग ठप्प, प्रवाशांचे हाल, वीजपुरवठा खंडित, शाळांना सुटी, 30 ते 40 हजार लोक अडकून पडल्याची शक्यता, पावसाचा जोर वसरला

9. कोल्हापूर - राज्यातील सत्तारूढ भाजप महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार, राजू शेट्टी आज घोषणा करण्याची शक्यता

10. मुंबई - राज्य सरकार आणि न्या. ओक वादावर पडदा; न्यायव्यवस्थेत कुणाची लुडबूड खपवून घेणार नाही म्हणत न्यायालयाने सरकारचा बिनशर्त माफीनामा स्वीकारला

11. ह्युस्टन - हार्वे या चक्रीवादळामुळे टेक्सस प्रांतात पाऊस आणि पुरामुळे हाहाकार उडाला, वादळाने आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतला

12. मुंबई - भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश

2. कोलंबो - कसोटी आणि वनडे मालिकेत भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंका निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला .

दिनदर्शिका


बुधवार३०ऑगस्ट २०१७
 
तिथि : शके १९३९भाद्रपद शुक्लपक्ष नवमी

सुर्योदय : ५:५९ म. पू.सुर्यास्त : ६:४३ म. नं.
-: आजचा सुविचार :-खरं स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपेत येत ते नसून जे तुम्हाला झोपू देत नाही.
-: आजचे पंचांग :-मास : भाद्रपद • पक्ष : शुक्लपक्ष • तिथि : नवमीयोग : विश्कम्भ • कारण : बालव • नक्षत्र : ज्येष्ठा

Tuesday, 29 August 2017

चालू घडामोडी


1. हरीयाणा - बाबा राम रहीमला विशेष कोर्टाने ठोठावला 30 लाखांचा दंड तर दोन्ही प्रकरणांमध्ये 20 वर्षाचा कारावास

2. नवी दिल्ली - राम रहीमने जवळपास 300 साध्वींवर बलात्कार केला तर शेकडो तरुणांना नपुंसक केलं, डेराच्या माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट

3. नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर ओप्पो आणि विवो यांनी आपल्या 400 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले

4. नवी दिल्ली - पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या 3 वर्षांत 30 कोटी कुटुंबांनी जन-धन खाती उघडली असून या खात्यांत 65 हजार कोटी रुपये जमा - पंतप्रधान

5. नवी दिल्ली - 2 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार डिजिटल केल्यास प्रोत्साहन लाभाच्या स्वरूपात जीएसटीत 2 टक्के सवलत देण्याचा सरकारचा विचार

6. नवी दिल्ली - आगामी काळात कितीही किंमतीच्या सोन्याच्या खरेदी आणि विक्रीवर पॅन कार्ड ​अ​निवार्य करण्यात येण्याची शक्यता

7. नवी दिल्ली - प्रतिजैविकांच्या अमर्याद वापरामुळे वाढत चाललेला धोका सरकारच्या लक्षात आला असून याच्या बेसुमार वापराला चाप लावण्याचा निर्णय

8. मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफी आणि पिकविम्याची ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली

9. मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट कामासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ यापुढे मिळणार नाही

10. मुंबई - एसटी कर्मचारी महिलांना प्रसुती रजेसोबत तीन महिने अतिरिक्त पगारी रजा; परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

11. सॅन फ्रान्सिस्को - फेसबुक सोशल नेटवर्किंग साइट्‌सचा प्रमुख मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले असून  मुलीचे नाव ऑगस्ट असे ठेवले

12. मुंबई - अभिनेता अजय देवगण याच्या ‘बादशाहो’ या चित्रपटात ‘दिवार’ या चित्रपटातील ‘कह दू तुम्हे’ हे गाणे वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली

13. कॅण्डी - भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या, अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे दिनेश चांदीमल उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.



राम रहीमला 20 वर्ष कैदेची शिक्षा व 30 लाख दंड

दोन साध्वींवर बलात्काराचा आरोपी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला सीबीआय कोर्टाने 20 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली. दोन्ही प्रकरणांत त्याला प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एक शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू होईल. यामुळे सध्या 50 वर्षे वय असलेला राम रहीम 70 वर्षांचा होईपर्यंत तुरुंगातच राहील. दोन्ही प्रकरणांत त्याला 15-15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. त्यातून दोन्ही पीडितांना 14-14 लाख रुपये मदत दिली जाईल. डेरा या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहे.

समाजसेवक असल्याचा दावा

शिक्षा सुनावण्याआधी न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी सीबीआयच्या वकिलांनी दहा वर्षांच्या शिक्षेची मागणी केली. ती ऐकूनच बाबा हादरला आणि स्फुंदून-स्फुंदून रडू लागला. त्यानंतर त्याच्या वकिलांनी बाबाने केलेल्या कामांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. रामरहीम समाजसेवक असल्याचा दावा त्यांनी केला आणि शिक्षेत सवलत द्यावी, अशी विनंती केली; पण या युक्‍तिवादाचा काहीच उपयोग झाला नाही.

निकालाचे वाचन पूर्ण झाल्यानंतरही बाबा रामरहीम रोहतक तुरुंगातील कोर्टरूममधून बाहेरच यायला तयार नव्हता. तिथेच फरशीवर तो रडत होता. त्याला पोलिसांनी खेचून बाहेर आणले आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेले. आता त्याला कैद्याचे कपडे दिले जातील आणि त्याला कोठडीत ठेवले जाईल. बाबा रामरहीमला कैदी क्रमांक 1997 दिला जाणार आहे. तीच आता त्याची ओळख असणार आहे.

राम रहीमकडे कोणते पर्याय ?

राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानले जाते. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.

राम रहीमवर आणखी 2 खटले

बाबावर आणखी दोन खटले चालू असून बलात्काराची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराचा खून केल्याप्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे. डेरा मुख्यालयात 456 शिष्यांना नपुंसक केल्याप्रकरणी आॅक्टोबरमध्ये निकाल आहे.

माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट

या सर्व प्रकरणादरम्यान राम रहीमच्या माजी सुरक्षा रक्षकाने गंभीर आरोप आणि काही गौप्यस्फोट केले आहेत. ज्यात राम रहीमने जवळपास 300 साध्वींवर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर शेकडो तरुणांना बाबाने नपुंसक केले. शिवाय डेऱ्यात किती लोकांच्या हत्या झाल्या, याचा हिशेब ठेवणं कठीण असल्याचे म्हटले आहे. बाबाने स्वत:च्या नावात लावलेल्या सगळ्या डिग्र्या खोट्या असल्याचंही माजी सुरक्षा रक्षकाने म्हटले आहे.

दिनविशेष - मेजर ध्यानचंद

               भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हॉकीतील त्यांचे योगदान व देशाप्रतीचा असणारा अभिमान यामुळे त्यांना आजही आदराचे स्थान आहे. अशा या महान खेळाडू विषयी आज जाणून घेऊयात...

मेजर ध्यानचंद यांचा जन्म

मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 ला अलाहाबादमध्ये झाला. वडील सामेश्वरसिंग  सैन्यात असल्यामुळं कुटुंबाचं स्थलांतरण कायम ठरलेलं. त्यामुळे ध्यानसिंग यांना जास्त शिकता आलं नाही. त्यांचं 6 वी पर्यंत शिक्षण झालं. वयाच्या 16 व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले. पैलवान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ध्यानसिंग यांना सुरूवातीच्या काळात हॉकीबद्दल फारसं आकर्षण नव्हतं. पण सैन्यदलात रंगणाऱ्या हॉकीच्या सामन्यांमुळे त्यांची हॉकीशी ओळख झाली.

ध्यानसिंग ते ध्यानचंदचा प्रवास

तत्कालिन मेजर बल्ले सिंग तोमर यांनी ध्यानसिंगच्या हातात हॉकी स्टिक सोपवली आणि याच हॉकी स्टिकनं पुढे ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनवलं. काम संपल्यानंतर ध्यानसिंग चंद्राच्या उजेडात हॉकीची प्रॅक्टिस करत. याच साधनेमुळं लोकं त्यांना ध्यानसिंगऐवजी ध्यानचंद असं म्हणू लागले.

राष्ट्रीय हॉकी संघात निवड

राष्ट्रीय पातळीवरही अगदी शेवटच्या 4 मिनिटात 3 गोल करत 0-2 च्या पिछाडीवरच्या संघास विजयश्री मिळवून दिल्यामुळे त्यांना भारतीय संघातून खेळण्यासाठी निवडण्यात आले. 1926 साली न्यूझीलंड हा भारताचा पहिलाच परदेश दौरा होता. या दौऱ्यात संपूर्ण हॉकी विश्वाला चक्रावून सोडणारा अभूतपूर्व पराक्रम घडला. भारतीय सैन्यदलाच्या संघानं 21 सामन्यांपैकी 18 सामन्यांत विजय मिळवला. या दौऱ्यात भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील 100 गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. यानंतर ध्यानचंद यांना शिपाई पदावरून थेट लान्स नायक पदावर बढती मिळाली.

सुवर्णपदकाची हॅट्रिक

अ‍ॅमस्टरडॅम येथे 1928 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये प्रथमच हॉकीचा समावेश करण्यात आला होता. अर्थातच या स्पर्धेत भारतीय संघाला प्रवेश मिळाला होता. पहिल्याच ऑलिम्पिक लढतीत भारताने ऑस्ट्रियाला 6-0 असे नमवून तर बेल्जियम, डेन्मार्क, स्विझर्लंड या संघांवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत यजमान नेदरलँडवर 3-0 असा विजय मिळवत ध्यानचंद यांनी भारताला हॉकीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पाच लढतींत त्यांनी तब्बल 14 गोल केल्याने हॉकी विश्वात हॉकीतील जादूगार अशी त्यांची कीर्ती पसरली. विशेष म्हणजे संपूर्ण ऑलम्पिकमध्ये भारताविरुद्ध एकही गोल नोंदवला गेला नाही.

1932 च्या ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघाने अपराजित राहत अंतिम फेरीत अमेरिकेवर 24-1 असा मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये यजमान जर्मनीविरुद्ध भारताने 8-1 असा विजय मिळवत ऑलिम्पिक सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. तीन ऑलिम्पिकमधील 12 लढतींत ध्यानचंद यांनी 33 गोल केले.

हिटलरने दिली कर्नलपदाची ऑफर

1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये यजमान जर्मनीला हरवल्यानंतर बक्षीस वितरणाला हिटलर उपस्थित होता. यावेळी हिटलरने ध्यानचंद यांना कर्नल पदाची ऑफर दिली होती. बक्षीस देताना हिटलर म्हणाला 'जर्मनीत ये, जर्मनीचं नागरिकत्व आणि सैन्यात कर्नलपद देतो तुला.'  ध्यानचंद यांनी हिटलरची ऑफर क्षणात धुडकावली ते म्हणाले 'नाही पंजाब रेजिमेन्टवर मला गर्व आहे आणि भारत भूमीचा मला अभिमान आहे.' हिटलरची ऑफर नाकारल्यानं ध्यानचंद यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. ज्या हिटलरसमोर उभं राहण्याची हिंमत कोणी करत नव्हतं. अशा वेळी त्याला नकार दिल्यानं ध्यानचंद यांचं कर्तृत्व उंचावलं होतं.

ध्यानचंद यांचा सन्मान

अशा या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असमान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले.

आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त आणि प्रथम दर्जा हॉकी सामन्यात 1000 पेक्षाही अधिक गोल करणाऱ्या ध्यानचंद यांना वयाच्या 51 व्या वर्षी 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ध्यानचंद यांचं चित्र असलेलं डाक तिकीटही सरकारनं छापलं. ऑस्ट्रियाच्या विएन्नामध्ये ध्यानचंद यांचा चारभुजाधारी पुतळा उभारण्यात आलाय ज्यात त्यांच्या चार हातात चार हॉकीस्टिक आहेत.

3 डिसेंबर 1979 रोजी कॅन्सरशी लढताना ध्यानचंद यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ध्यानचंद यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कार स्मशाणभूमीत न करता झाशीतल्या हॉकी मैदानावर करण्यात आले. ज्याठिकाणी ते तासंनतास हॉकीचा सराव करायचे. असा हा अवलिया आजही भारतरत्न सन्मानापासून वंचित आहे.

दिनदर्शिका

मंगळवार२९ऑगस्ट २०१७
 
तिथि : शके १९३९भाद्रपद शुक्लपक्ष अष्टमी

सुर्योदय : ५:५८ म. पू.सुर्यास्त : ६:४५ म. नं.
-: आजचा सुविचार :-स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका, आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
-: आजचे पंचांग :-मास : भाद्रपद • पक्ष : शुक्लपक्ष • तिथि : अष्टमीयोग : वैध्रुथि • कारण : विस्टि/भद्र • नक्षत्र : अनुराधा

Monday, 28 August 2017

आपला जिल्हा - गडचिरोली

३५ वा वर्धापनदिन-जिल्हा गडचिरोली
   
 
जिल्हाबद्दल महत्वाची माहीती

▪ गडचिरोली जिल्हाची निर्मिती - २६ आॅगस्ट १९८२

▪ मुळनिवासी (आदिवासी) जिल्हा म्हणून ओळख

▪ जिल्हाचे क्षेत्रफळ :- १४,४१२ चौ.कि.मी.
▪ भौगोलिक क्षेत्र :-१४९१ हजार हेक्टर
▪ ७० टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे.
▪ जिल्हातील लोकसंख्या :- १०,७२,९४२(२०११ जनगणना)
▪ तापमान सरासरी जास्त ४७ डी.से.तर कमी ११ डी.से.
▪ जिल्हात पर्जन्यमान :- सरासरी१४४० मीली.मी.
▪ हवामान :- उष्ण व दमट
▪ जिल्हाचे साक्षरतेचे प्रमाण :- ७४.३६%( पुरूष८२.३१, स्त्री ६६.२७)
▪ जिल्हात हजार पुरूषामागे स्त्रीयांचे प्रमाण :- ९८२
▪ जिल्हात बोलली जाणारी भाषा :- गोंडी, मराठी,हिंदी,बंगाली,तेलगु,छत्तीसगडी
▪ प्रशासकीय विभाग :- गडचिरोली, वडसा,अहेरी,कुरखेडा, चामोर्शी व एटापल्ली
▪ एकुण तालुके :- १२ ( गडचिरोली,आरमोरी,कुरखेडा, कोरची,धानोरा, देसाईगंज,चामोर्शी,मुलचेरा,अहेरी, भामरागड,एटापल्ली, सिरोंचा )
▪ जिल्हात एकुण ग्रामपंचात :- ४५७
▪ नगरपालीका :- गडचिरोली, वडसा
▪ नगरपंचायत :- दहा
▪ लोकसभा निर्वाचन क्षेत्र :- गडचिरोली - चिमुर
▪ विधानसभा क्षेत्र :-आरमोरी,अहेरी व गडचिरोली
▪ जिल्हात प्राथमीक शाळा :- १६३२
▪ माध्यमीक शाळा :- ३२८
▪ वरिष्ठ महाविद्यालय :- ५८
▪ शासकिय औद्योगीक प्रशिक्षणस संस्था : -१२, खाजगी :- ४
▪ शासकिय तंत्रनिकेतन संस्था :- १
▪ व्यावसायिक महाविद्यालय :- ९
▪ एकुण आदिवासी आश्रमशाळा :- १०१
▪ नवोदय विद्यालय :- १( घोट)
▪ कृषी महाविद्यालय :- १ गडचिरोली
▪ अभियांत्रीक महाविदयालय :-१ गडचिरोली
▪ गोंडवाना विद्यापीठ स्थापना :- २ आॅक्टो.२०११
▪ जिल्हातील पर्यटन व धार्मीक स्थळे :- मार्कंडा,चपराडा,बिनागुंडा,वनवैभव आलापल्ली,टिपागड, वैरागड, खोब्रामेंडा,सुरजागड,बाजागड, भामरागड,हेमलकसा,जितम,लक्कामेट्टा,सोमनूर,सिरोंचा,कुमकोट,झाडापापडा,महाल आमगांव,ठाणेगांव,आरमोरी,अरकतोंडरी,रेगडी,भोवरागड
▪ डोंगररांगा :- टिपागड, भामरागड, चिरोली,सुरजागड,सिरकोंडा,चिकीयाला
▪ लगतचे राज्य :- छत्तीसगड,आंध्रप्रदेश,तेलंगान
▪ मुख्य नद्या :- वैनगंगा,गाढवी,कठानी,पोर,सती,वर्धा,प्राणहिता,गोदावरी,इंद्रावती
▪ पिके :- धान,ज्वारी,गहू,हरभरा,मिरची
▪ राष्ट्रीय महामार्ग :- करीमनगर- जगदलपूर (सिरोंचा),चंद्रपूर- मुरूमगांव- मानपूर
▪ लोहमार्ग :- चंद्रपूर-वडसा-गोंदिया(१८.४६ कि.मी.)
▪ समाजिक संस्था :- मेंढा (लेखा), सर्च (चातगांव),लोकबिरादरी (हेमलकसा)
▪ लोककला :- रेला नृत्य,घेरा नृत्य,दंडार,

 


( टिप:- वरिल माहितीत काही फरक असु शकते.)
  

Saturday, 26 August 2017

अष्टविनायक

अष्टविनायकाचे वैशिष्ट्ये :-


            गणपती म्हटलं की आपल्यासमोर अष्टविनायक उभा राहतात. त्यातच सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. आपल्याकडे मोठ्या भक्ती भावाने श्री ची पूजा केली जाते. महाराष्ट्रात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून आपल्याकडे अष्टविनायकाचे दर्शन मोठे भाग्याचे मानले जाते. कोठे आहेत हे अष्टविनायक गणपती? त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? त्याविषयी आज जाणून घेऊया

1) *मोरगावचा मयुरेश्वर* : अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वरचा उल्लेख होतो. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.



2) *सिद्धटेकचा सिद्धीविनायक* : भीमा नदीच्या काठावर श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमूख असून त्यावर सुंदर कलाकूसर केलेली आहे. मंदिराचा गाभारा बराच मोठा आहे. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून 3 फूट उंच व 2.5 फूट लांबची आहे. मूर्ती उत्तराभिमूखी गजमुखी आहे. अष्टविनायकातील उजवीकडे सोंड असलेली ही मूर्ती आहे.

3) *पालीचा श्री बल्लाळेश्वर* : श्री बल्लाळेश्वर गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. श्री बल्लाळेश्वराच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आह.

4) *महाडचा श्री वरदविनायक* : श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ झालेल्या श्री वरदविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. इ.स. 1775 मध्ये पेशवाई काळात हे मंदिर बांधण्यात आले आहे.

5) *थेऊरचा श्री चिंतामणी* : थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. अतिशय प्राचिन क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे.

6) *लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक* : जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

8) *ओझरचा विघ्नेश्र्वर* : अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराची ओळख आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात.

9) *रांजणगावचा महागणपती* : पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे 'महागणपती'चे रूप आहे. श्री महागणपतीला कमळाचे आसन आहे.

Thursday, 17 August 2017

आधारचं महत्व

'या' सुविधांसाठी 'आधार' हवंच ! 

मुलांच्या शाळेचा प्रवेश असो किंवा मृत्यूच्या दाखला सर्वच ठिकाणी आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतोय. विविध 8  सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. आज त्या सुविधांबद्दल जाणून घेऊयात...

1) *बँक अकाऊंट* : बँकेच्या व्यवहारात 'आधार' ला अनन्य साधारण महत्व आहे. बँकेत अकाऊंट सुरू करण्यासाठी बँक प्रथम आधार क्रमांक मागते. कारण आपलं बँक अकाऊंट आधार क्रमांकाला जोडणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 50 हजार रुपयांपासून अधिक रकमेचं ट्रान्झक्शन करायचं असेल तर आधार आणि पॅन क्रमांक गरजेचा आहे.

2) *इन्कम टॅक्स रिटर्न* : तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी इन्कमटॅक्स रिटर्न फाईल करणं सोप्पं झालंय. यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करणं गरजेचं आहे.

3) *पॅन क्रमांक* : तुम्हाला पॅन क्रमांकासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे अगोदर आधार क्रमांक असणं गरजेचं आहे. शिवाय तुमच्याकडे अगोदरपासून पॅन क्रमांक असेल तर तो आधार क्रमांकाशी जोडणं गरजेचं आहे.

4) *प्रोव्हिडेंट फंड* : एम्प्लॉई प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) नं आधार कार्डला प्रोव्हिडंट फंडशी जोडणं अनिवार्य केलंय.

5) *मोबाईल सिम कार्ड* : आता आपला मोबाईल क्रमांकही आधार कार्डला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. अन्यथा तुमचा मोबाईल क्रमांक बंद होऊ शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नव्या नियमांनुसार, सिम कार्डसाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.

6) *पासपोर्ट* : जर तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तरीही तुमच्यासाठी आधारकार्ड उपयोगी आहे. ऑनलाईन-ऑफलाईन पासपोर्ट अर्जावर तुम्ही आपला आधार नंबर दिलात तर पासपोर्ट कार्यालय तुमचं व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून तुम्हाला लवकर पासपोर्ट लवकर मिळू शकतो.

7) *सार्वजनिक वितरणाचा लाभ* : सार्वजनिक वितरणाचे फायदे (PDS)मिळवण्यासाठीही तुम्हाला आधार क्रमांक सादर करणं गरजेचं आहे. PDS सबसिडीचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डला आधार कार्डशी लिंक करून घ्या.

8) *गॅस सबसिडी* : एलपीजी कनेक्शनवर सबसिडी देण्यासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर स्कीम (डीबीटीएल) सुरू आहे. एलपीजी ग्राहक नेट बँकिंगचा वापर करत असतील तर तुम्ही तुमचं आधार कार्ड याला लिंक करू शकता. यासाठी इंटरनेट बँकिंग अकाऊंटवर लॉग इन करा इथं तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय मिळेल. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्स भराव्या लागतील. जर डीबीटीएल स्कीममध्ये हा बँक अकाऊंट नंबर दिला असेल तर आधार नंबर भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएससोबत ईमेलही येईल. यानंतर एलपीजी सिलेंडरवर मिळणारी सबसिडी सरळ सरळ तुमच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होणं सुरू होईल.

चालू घडामोडी ( Current affairs )



1. नवी दिल्ली - भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी अयुब लेलहारीचा केला खात्मा

2. नवी दिल्ली - भारताच्या सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका असलेल्या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने 31,748 कोटी रुपये केले मंजूर

3. नवी दिल्ली - केंद्राने दिव्यांग निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहायकांचा भत्ता वाढवला, आता त्यांना 4500 रुपयांऐवजी 6,750 रुपये मिळणार

4. नवी दिल्ली - बिल गेट्स यांनी आपल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे 29,500 कोटींचे शेअर केले दान, 17 वर्षांतील स्वत:चे सर्वात मोठे दान

5. उरी - 7 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले जवान नरेंद्र सिंह हल्ल्यात यांचे निधन

6. हिमाचल प्रदेश - भूस्खलनामुळे 5 गावांना (सारजेबागला, जगेद, बदवाहन, रोपा, ससती) दिला सावधानतेचा इशारा, 150 गावक-यांना सुरक्षित स्थळी हलवले

7. बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी छोटी भाषणं करत आहेत, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच राहिले नाही : राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष

8. मुंबई - आतापर्यंत कर्जमाफीसाठी 10 लाख 11 हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली माहिती

9. कोल्हापूर - 'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोत स्थापणार नवी 'शेतकरी संघटना', येत्या दसऱ्याला सदाभाऊ नव्या पक्षाबाबत घोषणा करण्याची शक्यता

10. वॉशिंग्टन - भारतविरोधी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा अमेरिकेकडून परदेशी दहशतवादी संघटनांच्या सूचीत समावेश

11. फेसबुकने आपल्या डिझाईनमध्ये बदल करण्याचे दिले संकेत, लवकरच सर्व युजर्सला अपडेटच्या माध्यमातून बदल प्रदान करण्यात येणार

12. प्रो कबड्डी, गुजरात फॉर्च्युनजायंट्सची तेलुगू टायटन्सवर 29-19 अशी मात

13. प्रो कबड्डी, हरयाणा स्टीलर्स विरुद्ध तमिळ थलैवाज यांच्यातील सामना 25-25 असा बरोबरीत सुटला

14. मुंबई - अभिनेत्री रिया सेन (36 वर्ष) लवकरच लग्नबंधनात अडकणार,रिया तिचा बॉयफ्रेन्ड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधणार

Wednesday, 16 August 2017

खेळ जगत

भारतीय हॉकी संघाचा मालिका विजय

1.  अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने रोमांचक विजयाची नोंद करतांना बलाढ्य आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलॅन्डला 2-1 असे नमवले.

2.  गरजांत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजयात मुख्य योगदान दिले.

3.  विशेष म्हणजे मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने संघात तब्बल नऊ ज्युनिअर खेळाडुना संधी दिली, तरीही बलाढ्य नेदरलँडला पराभूत करण्यात भारताला यश आले.
4.  आक्रमक खेळ केलेल्या भारताने गुरजांत ( चौथा मिनिट ) व मनदीप ( 51 वा मिनिट ) यांच्या जोरावर बाजी मारली.

5.   तसेच यासह भारताने चीन सामन्यांची मालिकाही भारताने 2-1 अशी जिंकली.याआधी 13 ऑगस्टला भारताने नेदरलँडला 4-3 असा धक्का दिला होता.

चालू घडामोडी ( Current Affairs )




1. श्रीनगर - टेरर फंडिग प्रकरणात NIA चे जम्मू-काश्मीरमधील 12 ठिकाणी छापे, अल्ताफ अहमद शाह उर्फ अल्ताफ फंटूश याच्यासह 7 फुटीरतादावाद्यांना अटक

2. बिजींग - चिनी सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाची आपल्याला अजिबात कल्पना नाही : चीन

3. हिमाचल प्रदेश - चंबामध्ये 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती

4. नवी दिल्ली - गाईंची तस्करी रोखण्यासाठी सरकारकडून देशातल्या 85 लाख गाईंची ओळखपत्रे तयार

5. नवी दिल्ली - भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही विभागातील जवानांना एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाणार

6. गोरखपूर - बालमृत्यू प्रकरण, हॉस्पिटलकडे 69 लाख रुपये थकीत असताना ऑक्सिजनचा पुरवठा कधीही थांबवण्यात आला नव्हता, कंपनीचा दावा

7. बंगळूरु - कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु, यामध्ये सकाळचा नाष्टा 5 रुपयात तर, दुपार आणि रात्रीचे जेवण 10 रुपयात उपलब्ध होणार

8. हैदराबाद - रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणाने आत्महत्या केली, न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल, रोहित वेमुला दलित नव्हता

9. मुंबई - केंद्रीय मंत्रीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता, राज्यातही फेरबदलाचे संकेत, अनेकांचे मंत्रिपद जाणार

10. मुंबई - येत्या 3 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

11. मुंबई - बैलगाडा शर्यतींवर पुन्हा बंदी, राज्य सरकारचा अध्यादेश मुंबई हायकोर्टाने केला रद्द

12. मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या पदवी निकालांची 15 ऑगस्टची तिसरी डेडलाईनही टळली, अजूनही 144 परीक्षांचे निकाल प्रलंबित, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

13. एयरटेलचा नवीन प्लॅन, 399 रूपयांत 84 दिवसांसाठी 84 जीबी डाटा, विद्यमान आणि नवीन या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना हा प्लॅन घेता येणार

14. लाहौर - पाकिस्तानमध्ये क्लब क्रिकेट मॅच दरम्यान बॉल लागल्याने तरुण क्रिकेटरचा (जुबैर अहमद) मृत्यू

15. मुंबई - ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरची वर्णी

16. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31770.89, निफ्टी : 9897.30, सोने भाव : 28,834 (प्रतितोळा), चांदी : 38,372 (प्रतिकिलो)

Wednesday, 9 August 2017

जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


'बस्स झाली दुनियादारी....चला जपूया आदिवासी संस्कृती सारी...!!!'

जागतिक आदिवासी दिवस हि संकल्पना नेमकी काय आहे? हे समजून घेतले तर आपणास हा दिवस साजरा करणे महत्वाचे वाटेल. अन्यथा वेळ येते आणि जाते तसाच हा दिवस सुद्धा जाईल. परंतु असे जर घडले तर मग तो एक आदिवासी म्हणून आपला पराभव असेल. आपण आज अनेक सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतो. कधीकाळी निसर्गपूजक असणारे आदिवासी आज गणपती उत्सवसुद्धा मोठ्या आपुलकीने आणि आपलेपणाने साजरा करतात. जर आपण मुलनिवासी या नात्याने विचार केला तर आपली संस्कृती आणि आपली अस्मिता, समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता खरच 'बस्स झाली दुनियादारी....चला जपूया आदिवासी संस्कृती सारी...!!!' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

जागतिक आदिवासी दिवस काय आहे ? हे जर एक आदिवासी म्हणून मला सांगता येत नसेल तर आपण इतरांना काय सांगणार...म्हणून आपण या दिवसाविषयी सखोल ज्ञान करून घेणे गरजेचे आहे.

दुस-या महायुद्धातील चटके सहन केल्यानंतर सगळीकडे जागतिक शांतता, सर्व देशांमध्ये पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, एकमेकांचे अधिकार व स्वातंत्र्य जपणे, गरिबी हटविणे, शिक्षण व आरोग्य या विषयांवर मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. या विचारांचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती करण्यात आली. आज संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिका, रुस, चीन, फ्रांस, इंग्लंड, भारत असे एकूण १९२ देश सदस्य आहेत. आपल्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले कि २१ व्या शतकात ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग, संगणकाचे युग असे म्हणतो..., त्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगात आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. या विळख्यातून त्याला बाहेर पडायला संधी मिळण्याची शक्यता अधिकच अस्पष्ट आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस "जागतिक आदिवासी दिवस" म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासाभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात मग अमेरिका असो इतर आदिवासी समाज असलेले देश असोत त्यात भारताचाही सामावेस आहे...या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येवू लागला.

भारतातील आदिवासी समाजाच्या संर्वान्गीण विकासासाठी भारतीय संविधानात महत्वाच्या कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सन १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही शासनव्यवस्था चालविण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली. २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू करण्यात आले. भारतीय संविधानात एकूण २२ भाग, १२ अनुसूची आणि ३९५ अनुच्छेद समाविष्ट करण्यात आले. यात सर्वात जास्त अनुच्छेद आदिवासी समाजासाठी आहेत. यात प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या संरक्षणाचा विचार करण्यात आलेला आहे.